
सांडपाण्यावर प्रक्रिया न केल्यामुळे पुणे मनपाला रोज ३४लाखांचा दंड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ठोठावत आहे. आतापर्यंत १५ कोटी रुपयांची अशा प्रकारे वसुली केली गेली आहे.
दररोज ३४ लाख ७० हजार म्हणजे दर महिन्याला १० कोटी ४१ लाख आणि एक वर्षात साधारणपणे १२५ कोटी! सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ज्या जायका प्रकल्पावर काम चालू आहे तो पूर्ण व्हायला ३-४ वर्षे नक्कीच लागतील असे पालिकेतील अधिकारीच कबूल करतात. म्हणजे हे होईपर्यंत १२५x३ किंवा ४ म्हणजेच ३७५ ते ५०० कोटी एव्हढा अवाढव्य दंड पुणेकर नागरिकांना भरावा लागणार असे स्पष्ट आहे. जायका प्रकल्पाचे संपूर्ण बजेट १००० कोटीचे आहे आणि तो वेळेत पूर्ण न केल्याबद्दलचा दंड ५०० कोटी! केव्हढे दूरदर्शी नियोजन आहे आपल्या शहराचे!!!
निदान या कारणाने तरी मैलापाण्यावर १००% प्रक्रिया करण्याचे प्रकल्प त्वरित आणि प्राधान्याने मार्गी लावावेत असा दबाव नागरिकांनी शासन आणि प्रशासनावर आणायला पाहिजे.